• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home ब्लॉग

भूमिका घेणाऱ्या ‘माणसांची साखळी’ तयार होत असल्याचं समाधान !

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in ब्लॉग
499
0
309
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि सत्ता , संपत्ती , शारीरिक , बौद्धिक इत्यादी ताकतींचा वापर आपण कसा करतो , यावर ‘ माणूस ‘ म्हणून आपली वास्तविक उंची ठरत असते ! ताकतींच्या जोरावर जबरदस्तीनं उंची निर्माण करण्याचा प्रयत्न पोकळ असतो , तात्कालिक असतो . खोटा अभिमान , पैसा , दंभ यांद्वारे उभी राहिलेली प्रतिमा लवकर रसातळाला जाते . याउलट आपल्याजवळ जे आहे ते असणं , ही आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांची , परिस्थितीची देन आहे , हे कळलेल्या लोकांचे पाय जमिनीवर असतात ! आणि हो , विवेकी भूमिका घेण्याचा विषय ज्याच्या त्याच्या जडणघडणीवर अवलंबून असतो !

आजवरच्या प्रवासात भेटलेल्या कित्येक लोकांना आपण रुजण्यासाठी पाणी घातलेलं आहे . या पाण्यावर वाढलेली झाडं अमरावतीपासून सोलापूर आणि नाशिक पासून पुणे , मुंबई , कोल्हापूर , कर्नाटकपर्यंत वाढलेली आहेत . ही झाडं कुणाला तरी सावली देत आहेत किंबहुना त्यांनी ती देत रहावं , यापेक्षा अजून काय हवं आहे आपल्याला ! पाणी घालणाऱ्या माणसाबद्दल त्यांनी स्मृत्या ठेवाव्यात असं काही बांधील गणित नाही ! असो !!

कोल्हापुरातून मला आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त करणारा फोन 7 – 8 वर्षांपूर्वी आला होता . मी नेहमीप्रमाणे आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीला त्याची नोकरी , व्यवसाय , कौटुंबिक स्थिती वगैरे विचारली . सगळं समाधानकारक आढळल्यावर काही दिवसांनी आर्थिक मदतही स्वीकारली . यानंतर रस्त्यात दिसणारे मनोयात्री , जखमी पशु – पक्षी यांबद्दल ‘ काय भूमिका घेऊ ? ‘ , अशी विचारणा करणारे फोन या व्यक्तीकडून येऊ लागले . कोल्हापुरातल्या आपल्या कुठल्याही सामाजिक सेवेचा विषय आल्यावर निखिल कोळी या मित्राशिवाय मार्गी लागणार नाही या साखळीत आता आणखी एक कडी जोडली गेली . – गौरीश सोनार !

आज गौरीशबद्दल लिहिण्याचं काही विशेष कारण नाही ; पण सत्ता संपत्तीचा भरमसाठ ‘ साठा ‘ असणारे ,घरातल्या अन्नाला अनेकदा कचराकुंडी दाखवणारे , निव्वळ स्वतःभोवतीच भौतिक सुखाचं रिंगण करून भ्रमात असणारे आणि याउलट मोजक्या सत्ता संपत्तीचा सदुपयोग करत वास्तविक आनंदात असणाऱ्या माणसांबद्दल लोकांना कळलं पाहिजे .

एकदा एक बेघर माणूस गौरीशला दिसला . तो रस्त्याकडेला रहात होता . गौरीशनं मला फोन करून त्याची माहिती दिली . तो मनोयात्री नव्हता ; परंतु त्याला जवळचं कुणी नसल्यामुळं तो या परिस्थितीत रहात होता . गौरीशनं त्याला ताडपत्री विकत आणून पावसाचा निवारा होईल अशी स्थिती केली . एका बेघर माणसाला या निवाऱ्याचं सुख चार भिंतीत सुरक्षित असणाऱ्या लोकांना कळणार नाही ! सुतारकाम करणाऱ्या या माणसानं त्या झोपडीत जुजबी सामानानिशी काम करायला सुरुवात केली . या काळात निखिलनं त्याला एक वेळ डबा लावून त्याचे पैसे भागवण्यास सुरुवात केली . एका डब्यात दोन वेळा जेवत हा माणूस आजही स्वाभिमानानं काम करत आहे …

कोविड पॅण्डेमिक सुरू झाल्यानंतर गौरीश सतत फोन करून ‘ पैसे लागले तर कळवा ‘ , असं विचारत राहायचा . परंतु आपल्याकडं पुरेसे पैसे असल्यामुळं आपण त्याची मदत घेतली नाही .
शिवाजी पेठ , कोल्हापूर इथं महापुराच्या काळात आपण मदत करताना अभिजित बरगे यांनी अंध कुटुंबांबद्दल सांगितलेलं होतं . आपण तेव्हा या कुटुंबांना पुरेशी मदत पोहोचवली होती . कोरोनाच्या साथीत या कुटुंबांपर्यंत आपल्याला पोहोचता आलेलं नव्हतं . गौरीशनं या कुटुंबांपर्यंत पोहचत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या .

सांगरुळ गावात ई – बिर्याणी नावाचं दुकान असणाऱ्या अक्षय भास्कर या मित्रानं कडक लॉकडाऊन असतानाही एका मनोयात्रीला सहा – सात महिने घास भरवण्याचं काम केलेलं आहे .
बेलापूर ( मुंबई ) इथं लक्ष्मी शामल सुभाष या मैत्रिणीनं यापूर्वी एका मनोयात्री महिलेला उपचार मिळवून देण्यात मदत केल्यामुळं घर सापडल्याबद्दल मी पूर्वीच लिहिलं आहे . यावेळी त्वचेच्या रोगामुळं घराबाहेर सोडलेल्या मांजरीला तिनं औषधोपचार आणि निवारा दिला . आणि रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेली जांभळ्या पाणकोंबडीला जीवदान देण्याचं काम केलेलं आहे .
आजऱ्यात उदरनिर्वाहासाठी चिकन सेंटर चालणाऱ्या वाहिदचा महिन्या दोन महिन्यातून कुत्र्यांना वाचवल्याचा फोन येतो …
डॉ . माहेश्वरी बारड ताईंनी कुत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मनोयात्री आणि बेघर कुटुंबाला आधार दिलेला आहे .
तुफेल आगा नावाच्या मित्रानं मनोयात्रीला खायला प्यायला घातलं आणि मला फोटो पाठवले .

असे कित्येक लोक माणूस , प्राणी , पक्षी , झाडं आणि संबंध पर्यावरणाला स्वतःइतकंच प्रेम करतात . त्यांच्याबद्दल कधी फोटो स्वरूपात लोकांसमोर येतं आणि बहुतेकांना फोटो काढायला वेळ मिळत नाही – या सगळ्यांनाच सलाम !

कित्येक लोकांचे फोन येतात आणि मनोयात्री किंवा जखमी पशु – पक्षांना कशी मदत करू किंवा मदत केल्याबद्दल कळवणारे फोन येतात तेव्हा आपण लिहिलेलं किंवा एखाद्या व्याख्यानात बोललेलं सार्थकी लागल्याचं समाधान होतं .
एका बाजूला भूमिका घेतल्याचं समाधान आणि दुसऱ्या बाजूला भूमिका घेणाऱ्या ‘ माणसांची ‘ साखळी तयार होत असल्याचं समाधान … अशा दुहेरी समाधानाच्या आनंदाला सीमा नाही !

गौरीशला त्याच्या विवाहाच्या प्रसंगी आपण गुलमोहर दिलेला होता … त्याची वाढ आनंददायी आहे … तो बहरतोय …!

– अमित प्रभा वसंत, कोल्हापूर

Previous Post

बाल संरक्षणाच्या मुद्द्यावर ‘भाकर टीम’चा लोकप्रतिनिधींशी संवाद

Next Post

जागतिक स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती

Next Post

जागतिक स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version