ठाणे : कॉलेज जीवनात सर्वात धोकादायक असेल तर तो मोबाइल! मोबाइल वरुन चालू होणाऱ्या ऑनलाईन मैत्री, ऑनलाइन प्रेम या गोष्टी मुलांसाठी अत्यंत घातक आहेत. मोबाईलचा उपयोग फक्त आणि फक्त कामासाठी करावा. करमणुकीसाठी खेळ, वाचन, नाट्य आणि इतर कलांचा मार्ग चोखावा, असे कळकळीचे आवाहन जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केले. समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या एकलव्य गौरव पुरस्काराच्या पाठपुरावा कार्यक्रमात त्या कॉलेजची दुनिया या विषयावरील सत्रात बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी होत्या. कार्याक्रमाचे सूत्र संचालन एकलव्य कार्यकर्ता प्रवीण काळे याने आणि प्रस्तावना संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी केली. नुकत्याच १० वी उत्तीर्ण होऊन कॉलेज मध्ये प्रवेश करणाऱ्या एकलव्यांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या, मुलांनी आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी किती कष्ट केलेत हे लक्षात ठेवावं आणि कॉलेज मध्ये आपण मुख्यत्वे अभ्यास करायला येतो हे विसरू नये. पुढची पाच वर्ष ही तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्वाची आहेत. ती तुम्ही तुमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापरा. अन्य मोहांना बळी पडू नका.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की संस्था एकलव्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यास सदैव तयार असते. त्यासाठी संस्था वर्षभर अनेक उपक्रम, कार्यक्रम करत असते. त्यात सक्रिय सहभाग एकलव्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात २५ एकलव्यांना गौरव पुरस्कार देण्यात आले. संस्थेच्या स्मिता मोरे या एकलव्य कार्यकर्त्यांनी आपले अनुभव सांगून नवीन एकलव्यांना संस्थेच्या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर बने, इनोक कोलियर, निलेश दंत, सलोनी शिर्के, ओम गायकवाड, वैष्णवी करांडे, टिशा दाडीया, करीना साहुद या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
