नंदुरबार : जिल्हा महिला बाल विकास विभाग अंतर्गत बाल संरक्षण कक्ष नंदुरबार आणि जन साहसच्या कार्यकर्त्यांना नवापुर तालुक्यातील बाल हाठ गावातील नियोजित बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. सदरच्या बालविवाहामध्ये मुलाचे वय २० वर्ष तर मुलीचे पंधरा वर्ष दहा महिने आहे.
बालविवाह होणार असल्याच्या माहितीच्या आधारे सर्वप्रथम संबंधित गावातील अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्यासोबत अल्पवयीन मुला–मुलींच्या वयाबाबत खात्री करण्यात आली. विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस संरक्षण घेत सदर गावात जाऊन हा बालविवाह थांबण्याची कार्यवाही करण्यात आली.
यावेळी जन साहसच्या आणि बाल संरक्षण कक्षातील कार्यकर्त्यांनी मुलाच्या घरी जाऊन मुलाचे आई, वडील, नातेवाईक, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी ताई, आशा ताई, गावातील जेष्ठ नागरिक यांना एकत्रित जमवून त्यांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्याची जाणीव करून दिली तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. बाल विवाह प्रतिबंधक कायद्यामधील शिक्षेच्या तरतुदी याबाबत संबंधितांना अवगत करण्यात आले. तसेच गाव बाल संरक्षण समिती सक्रियपणे काम करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.
बालाहाट येथील सरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून बालविवाह थांबवण्याबाबतचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडिओ तयार करून करण्यात आले. सदर बालकाला आणि त्याच्या पालकांना आवश्यक कागदपत्रासहित बालकल्याण समितीला सादर करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.
गावातील सरपंच पोलिस पाटील अंगणवाडी सेविका आणि ज्येष्ठ नागरिकांनी ‘आम्ही हा बालविवाह थांबविला असून यानंतर आमच्या गावात कोणताही बालविवाह आम्ही होऊ देणार नाही याबाबतची आश्वासन जिल्हा बाल संरक्षण टीमला दिले आहे.
गावातील सरपंच पोलिस पाटील इतर नागरिकासह बालिका, आई, वडील यांच्यासोबत संवाद साधत सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले. बालिकेचे समुपदेशन जन साहस संस्था समुपदेशक आणि बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे यांनी स्थानिक बोली भाषेत केले.
संबंधित गावकऱ्यांना घटनेचे गांभीर्य बालविवाह प्रतिबंधक, कायदा, बालविवाहाचे दुष्परीणाम, मुलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना, शिक्षण हमी कायदा, पोक्सो कायद्यातील काही संदर्भ सांगून गावात येणाऱ्या काळात अशा प्रकारचे बालविवाह होऊ नयेत यासाठी गावपातळीवरच गाव बाल संरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती आणि शासनाच्या गावपातळीवरील यंत्रणांनी (अंगणवाडी ताई, आशा ताई, पोलीस पाटील, शिक्षक, ग्रामपंचायत) करावे असे आव्हान करण्यात आले.
संबंधित बालक आणि बालिका ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेतील शिक्षक, गाव बाल संरक्षण समिती, यांच्या संपर्कात राहून बालिका १८ वर्षापर्यंत आणि पुढेही शिक्षण घेईल यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून सतत पाठपुरावा केला जाणार आहे.
सदर कार्यवाही प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गौतम वाघ (PO -Ic), रेणुका मोघे (PO-NIC), जन साहस संस्थेचे जिल्हा समनव्यक विकास मोरे, कार्यकर्ती प्रियंका पाडवी उपस्थित होते.
