बीड – गेवराई : शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमरसिंह पंडित यांनी २२ वर्षांपासून सामुहिक विवाहाची चळवळ सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि भव्यदिव्य पद्धतीने ही चळवळ सातत्याने सुरु ठेवून शारदा प्रतिष्ठानने सामाजिक भान जपले आहे. हा काही राजकीय उपक्रम नाही तर हा एक सामाजिक उपक्रम आहे. अवास्तव खर्चाला फाटा देत येणाऱ्या काळातही ही चळवळ व्यापक पद्धतीने राबवली जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठानद्वारा आयोजित २३ व्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, महादेव महाराज भाटेपुरी, उद्धव महाराज शास्त्री, स्वामी जनार्दन महाराज, रघुनाथ महाराज निंबाळकर, भगवंत महाराज पट्टे, नामदेव महाराज, भगवान महाराज जोशी, श्रीपाद देवा, लिंबाजी महाराज, तिर्थराज पठाडे महाराज, भाऊसाहेब महाराज जोशी, भाऊसाहेब महाराज जोशी, प्रकाश महाराज रुचके, बाळनाथ महाराज येवले, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महादेव चिंचोले, डॉ.संजय कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले की,आजही अनेकांना असे वाटते की आपल्या मुलामुलींचे लग्न आपल्या दारात झाले पाहीजे, ही मानसिकता आजही कायम आहे. ही मानसिकता बदलून आवास्तव खर्चाला फाटा देत आपण अगदी थाटामाटात होणा-या या सामुहिक विवाहाच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे असे सांगून ते म्हणाले की या चळवळीला यापुढेही आपण व्यापक पद्धतीने नेवूया. हे एक सामाजिक काम आहे याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे सांगून आपण दिलेल्या प्रेम आणि आशिर्वादाच्या बळावर शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज विधायक कामे केली जात आहेत असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी मच्छिंद्र गडाचे मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नव वधु शितल निरगुडे व वर अनिल माळवदे आणि अंजली नरके अणि वर अतुल भवार यांना संसारपयोगी साहित्य भेट दिले.
प्रारंभी जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी परण्या काढण्यात आला. ६ वाजून ३५ मिनिटांनी मंगलमय वातावरणात २१ जोडपी हजारो व-हाडी मंडळीच्या साक्षीने संत महंताच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. नव वधू वर यांना प्रतिष्ठानच्या वतीने कपडे, मणी मंगळसूत्र, बुट, चप्पल, संसारपयोगी व इतर साहित्य देण्यात आले.
या सोहळ्याला नववधूवर, त्यांचे नातेवाईकासह व-हाडी मंडळीचे दुपारपासुनच आगमन सुरु झाले होते.जयभवानी देवी मंदिर परिसर गर्दीने गजबजला होता. दुपारी १२ वाजता व-हाडी मंडळीच्या भोजनाला प्रारंभ झाला. विवाह सोहळ्यास आलेल्या संपूर्ण व-हाडी मंडळीच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. अमरसिंह पंडित,जयसिंग पंडित, विजयसिंह पंडित स्वतः भोजन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. येणा-या व-हाडी मंडळीचे प्रतिष्ठानचे पदाधिका-यांनी उत्साहाने आदरातिथ्य केले.भोजन व्यवस्था समिती व प्रतिष्ठानचे स्वयंसेवकांनी अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने भोजन व्यवस्था सांभाळली.
