सातारा : विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव करणार्या हेरवाड व माणगाव ग्राम–पंचायतींना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आलाआहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या दिवशी हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात विधवांशी निगडीत अमानुष प्रथा निर्मूलनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांतून बदलाला चालना मिळाली, परंतु आजदेखील बहुतेक सर्व जाती– धर्मांतील विधवा स्त्रियांना विविध प्रथांच्या नावे मानवी सन्मान व प्रतिष्ठा नाकारण्यात येते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व त्यानंतर माणगाव या गावांच्या ग्रामसभांनी विधवांची अवहेलना करणार्या प्रथा बंद करण्याचा ठराव करणे ही प्रेरणादायीघटना आहे. त्यामुळे सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हेरवाड व माणगाव या दोन ग्राम पंचायतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे.
ज्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे त्या सत्यशोधक केशवराव विचारे यांनी वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी सरकारी नोकरी सोडून सत्यशोधक समाजाच्या व सहकार चळवळीच्या कामाला वाहून घेतले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष व महाध्यक्ष राहिलेले आहेत.
ही अभिनव कल्पना मांडून ती आमलात आणण्याची प्रेरणा देणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळ या संस्थेचे प्रमोद नामदेव झिंजाडे, करमाळा, यांचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात येईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील व डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते व लोकप्रिय अभिनेते किरण माने यांच्या विशेष उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीच्या वतीने देण्यात आली.







