‘भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात’ महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

2d0f9137 E8ef 4b69 8fac 160f101c783a 1.jpg

पुणे : उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत लहान मोठे पन्नास जण शनिवारी (दि.६) रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले, भूतांची माहिती जाणून घेतली, त्यांना साद घातली, पण भुते काही दिसली नाहीत. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समाज काही खरा ठरला नाही. मात्र इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापुर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातवाजेपासून रविवारी सकाळी सातवाजेपर्यन्त पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. यावेळी गावाचे सरपंच सचिन सातव, शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मयूर पटारे, निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे, अनुज भुजबळ, मनोहर पाटील, समाधान भगत, नम्रता ओव्हाळ, राज भगत, ज्ञानेश महाजन, संजय निकम, योगेश हुपरिकर, मंगेश चित्ते, सुरज चव्हाण, विवेक इंगोले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.

भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर.

‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Exit mobile version