फलटण : एकीकडे जात-पात आणि धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात असताना, दुसरीकडे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत फलटणमध्ये एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून ‘फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन’च्या वतीने ५६ वा आंतरधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
फलटण तालुक्यातील जाधववाडी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात प्रा. ॲड. करिश्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांनी आपली जीवनगाठ बांधली. हा विवाह कोणत्याही कर्मकांडाशिवाय, पूर्णपणे सत्यशोधक पद्धतीने पार पडला. प्रारंभी संविधान आणि फुले दाम्पत्याचे समग्र वाङ्मय हातात घेऊन नवदाम्पत्याचे आगमन झाले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि महात्मा फुले रचित मंगलगाथांनी (मंगलाष्टकांनी) विवाह विधी पूर्ण करण्यात आला.
या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपारिक अक्षतांचा वापर टाळून सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. नवदाम्पत्याला सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. श्रेयस आणि करिश्मा यांनी यावेळी शपथपत्र वाचन करून संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा आणि निर्भय सत्यशोधक समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, “सत्य, समता आणि मानवतेवर आधारित हा विवाह केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो समाजाला दिशा देणारा संदेश आहे. आजच्या काळात अशा विवाहांचे अनुकरण होणे ही काळाची गरज आहे.”
या सोहळ्याला प्रा. सुदाम धाडगे, ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विकास शिंदे, जगदीप भगत यांच्यासह विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि दोन्ही कुटुंबातील मोजके नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ॲड. करिश्मा मुलाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि एक प्रेरणादायी कविता सादर केली.
हा सोहळा म्हणजे केवळ एक लग्न नसून पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला पुढे नेणारे एक पाऊल ठरले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






