पुणे : शासनाने बालमजुरीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी तयार केलेल्या पेन्सिल पोर्टलमध्ये पुणे जिल्ह्याचा लवकरात समावेश करावा, अशी मागणी बालहक्क कृती समितीच्या (आर्क) च्या युवकांनी केली आहे.
शासनाने बालमजुरीच्या तक्रारी सर्वसामान्यांना नोंदविता याव्यात यासाठी pencil.gov.in हे पोर्टल तयार केले आहे. सुरुवातीला यामध्ये पुण्याच्या तक्रारी देता येत होत्या. पुण्यातील नागरिकांनी आतापर्यंत अनेक तक्रारी या पोर्टलवर नोंदविल्या आहेत. मात्र ३ – ४ महिन्यांपासून पुण्याचा पर्याय या पोर्टलमधून काढून टाकण्यात आला आहे. बालमजुरी सारखी अनिष्ट प्रथा नष्ट करायची असेल तर त्यासाठी बालमजुरीच्या अधिकाधिक तक्रारी नोंदविल्या जाणे आवश्यक आहे. त्यामुळे पेन्सिल पोर्टलमध्ये पुण्याचा समावेश करावा, अशी मागणी बालहक्क कृती समितीकडून करण्यात आली आहे.
बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून ३० एप्रिल (राष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन) ते १२ जून (जागतिक बालमजुरी विरोधी दिन) असे बालमजुरी विरोधात ४४ दिवसांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील डेक्कन, विमाननगर, पुणे स्टेशन, येरवडा, नगर रोड व इतर परिसरामध्ये बालमजुरी विरोधात जनजागृती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर ‘बालमजुरी विरोधी अभियान’ (CACL) या संघटनेद्वारे राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचा हा एक भाग असून, ‘बालमजुरी-मुक्त भारत’ (Child Labour Free India) हे उद्दीष्ट समोर ठेवून विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा पातळीवर, ३० एप्रिल २०२२ रोजी पेन्सिल पोर्टलच्या स्टिकर्सचे उद्घाटन करून, ठिकठिकाणी स्टिकर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पेन्सिल पोर्टलबाबत जनजागृती करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने देखील या उपक्रमाची दखल घेतली असून, पोलिस व स्थानिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमधून पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पेन्सिल पोर्टलविषयी जनजागृती करण्यात आली आहे. याबरोबरच बालहक्क कृती समितीच्या युवकांनी पेन्सिल पोर्टलच्या माहिती प्रसारासाठी लघुफिल्म तयार केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यात येत आहे.
‘बालहक्क कृती समिती’ हे पुण्यातील बालकांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे संघटन असून, बालमजुरी, बालविवाह, बाल संरक्षण, तसेच शिक्षण व बालकांचा सहभाग, या मुद्द्यांवर समितीचे काम गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. जिल्हास्तरीय बालमजुरी विरोधी कृती दल सक्रीय रहावे यासाठी बालहक्क कृती समिती विशेष प्रयत्न करीत आहे. बालकामगार मुक्तता, पुनर्वसन व प्रतिबंध अशा सर्व टप्प्यांवर जनजागृती व थेट हस्तक्षेप याद्वारे काम सुरु आहे. यामध्ये शहरातील युवकांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्याचे नियोजन केले जात आहे.
